‘काश, मास्क ठीक से पहना होता’!

कोरोनाविषयक जागृती मोहिमेचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते प्रारंभ

नागपूर, दि.28 :  कोरोनापासून वाचायचे असेल तर मास्क घालणे अत्यावश्यक आहे. एक छोटीशी मुखपट्टी (मास्क) कोणाचा तरी जगण्याचा आधार, कोणाचेतरी छत्र हिरावण्यापासून वाचवू शकते. परंतु नागरिकांमध्ये असलेली बेफिकरीमुळे अनेकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले आहेत. कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर मास्कची आवश्यकता सर्वसामान्य नागरिकांना कळावी यासाठी ज्येष्ठ छायाचित्रकार व कलावंत विवेक रानडे यांच्या कल्पकतेतून जनजागृती मोहीम साकारली आहे. या विशेष मोहिमेचा शुभारंभ विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाला.
कॅलामेटी रिसपॉन्स ग्रुप नागपूर व माहिती व जनसंपर्क विभाग हे संयुक्तपणे कलात्मक कोरोनाविषयक जाहिरात मोहीम राबविणार आहे. या मोहिमेला जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य मिळणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात एक छोटेखानी कार्यक्रमात कोरोनाविषयक जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी विवेक रानडे, अमित पंचेमेतीया, माहिती संचालक हेमराज बागुल, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक गौरी पंडीत-मराठे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच मास्क घालणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे निर्देश आयसीएमआरने दिले होते. नागरिकांकडून मास्क न घालण्याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाईसुद्धा सुरु केली आहे. परंतु मास्क न घालणे व घातला असल्यास व्यवस्थित न घालणे याबद्दल बेफिकरीची वृत्ती सर्वत्र दिसून येत आहे. मास्क घातला तर आपले अमूल्य प्राण वाचू शकतात या कल्पनेच्या आधारे विवेक रानडे यांनी कलात्मक जाहिरात मोहीम तयार केली आहे. ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी प्रशासनातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे आई, वडील, भाऊ, मित्र, आजी, आजोबा आदी आप्तजन आपण गमावले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमाचे आपण काटेकोर पालन केले असते तर या सर्वांचे प्राण वाचवू शकलो असतो. दुसऱ्या लाटेनंतर तरी आता जागृत होण्याची वेळ आली आहे. मुखपट्यांचा वापर करणे आवश्यक आहेच परंतु मुखपट्टी वापरताना ती केवळ दंडात्मक कारवाई होऊ नये एवढ्यापुरतीच नसून कोरोनापासून संरक्षणासाठी आहे. याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता आदीच्या लाटेपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुखपट्ट्यांचा योग्य व शास्त्रोक्त करावा यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.
कोरोनापासून बचावासाठी मुखपट्टी हेच शस्त्र राहणार आहे. मुखपट्टी घाला नाहीतर कोरोना होण्याचे प्रमाण वाढेल, आपले कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी मुखपट्टीचे महत्त्व या जागृती मोहिमेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर यांनी पुढाकार घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here