हल्ले करणा-या अस्वलीला जेरबंद करा : शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी

चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा गेट बाहेरील जमनजट्टी परिसरात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (ता. १५) या अस्वलीने लालपेठ परिसरात प्रवेश करून एकाला गंभीर जखमी केले. पंधरवड्यातील ही दुसरी घटना असल्याने अस्वलीला जेरबंद करणे गरजेचे आहे. मात्र, वनविभागाच्या अधिका-यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेऊन अस्वलीला जेरबंद करण्याचे निर्देश वनविभागाला द्यावे. अन्यथा मुख्य वनसंरक्षकांना घेराव घालू, असा इशारा चंद्रपूूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
पठाणपुरा गेटबाहेर सकाळी-संध्याकाळी फिरायला जाणा-यांची संख्या मोठी आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या परिसरात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. मागील आठवड्यात अस्वलीने हल्ला करून दोघांना जखमी केले होते. त्यानंतर अस्वलीला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, आठ दिवस लोटूनही अस्वलीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यातच सोमवारी (ता. १५) सकाळच्या सुमारास अस्वलीने या परिसरालगत असलेल्या लालपेठ येथील भरवस्तीत प्रवेश करून पुन्हा हल्ला केला. यात एक जण गंभीररित्या जखमी झाला.
अस्वलीच्या घटना वारंवार घडत आहेत. वनविभागाकडून अस्वलीला तातडीने जेरबंद करणे गरजेचे होते. मात्र, वनविभाग फारसे गंभीर दिसत नाही. त्यामुळे भविष्यात हल्ल्यात एखाद्याला जीव गमवावा लागू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. अशी अनुचित घटना घडू नये म्हणून वनविभागाला तातडीने अस्वलीला जेरबंद करण्याचे निर्देश द्यावे. अन्यथा घडणा-या घटनेला वनविभागाचे अधिकारी आणि प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देणा-या शिष्टमंडळात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी, एनएसयुआयचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे, संजय गंपावार,अनिश राजा, बंटी शैनेशचंद्र यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here