

चंद्रपूर:तलावातील प्रदूषित पाणी उपसा करून तलावातील प्रदूषण दूर करण्याचा संदेश देण्यास आज इको-प्रो तर्फे “पाणी उपसा” प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
पूर्वीच्या काळी वसाहतीमध्ये नागरी सुविधा नसल्याने घरातील सांडपाणी एक खड्डा खोदून सोडले जायचे, खङ्ङा भरून वाहू लागला की ते बकेटने भरून दूर फेकले जायचे.
नागरी सुविधा, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या नसलेल्या भागात सांडपाणी जमा होणारे खड्डे असायचे, अशाच पद्धतीने शहरातील नागरिकांचे सांडपाणी जमा होण्याचे केंद्र म्हणून ‘रामाळा तलाव’ तयार झाले आहे. सांडपाण्यामुळे भूमिगत जलप्रदूषित होत आहे. त्यामुळे सदर दूषित पाणी उपसा करण्याची गरज असल्याने मंगळवारी इको-प्रोतर्फे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. इको-प्रो सदस्यासह स्थानिक युवकांनी सहभागी होत बकेटने तलावातील पाणी काढून दूरवर नालीत फेकण्यात आले.
आज उपोषणाचा दुसरा दिवस होता. आज दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. यात फीमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय मोगरे, दृष्टी सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष एडवोकेट वर्षा जामदार, श्री वर्धमान सोशल अँड एज्युकेशन ॲकॅडमीचे अध्यक्ष महेंद्र मंडलेचा आणि सचिव अमर गांधी, लायन्स क्लब ऑफ चंद्रपूरचे सुनील कुलकर्णी, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर. पी. इंगोले, उपप्राचार्य डॉक्टर एस. पी. माधमशेट्टीवार, चेतना संघर्ष मंचचे राजेश विजरकर, मनोहरभाई टहलियानी, राजकुमार पाठक, गजानन गावंडे गुरुजी, हनुमान मंदिर समिती चंद्रपूर, डॉ. संजय घाटे, पंकज चिमरालवार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
उद्यापासून इको-प्रो सदस्य-नागरिकांचे साखळी उपोषण
रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी इको प्रोचे सर्व सदस्य आणि शहरातील नागरिक बुधवारपासून साखळी उपोषण करणार आहेत.