सोमवारपासून पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे यांचे ‘अन्नत्याग सत्याग्रह’

चंद्रपूर: शहरातील गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला ‘रामाळा तलाव’ आज अतिक्रमणाने गिळंकृत होत आहे. तलाव खोलीकरण आणि प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. मात्र, वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करून खोलीकरणाच्या मागणीसह अन्य मागण्यासाठी सोमवार, 22 फेब्रुवारीपासून अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे.

वर्ष 2008 मध्ये रामाळा तलावात आलेली इकाॅर्नीया वनस्पती निर्मुलनाची मागणी व स्वच्छता अभियान राबविण्यापासुन इको-प्रो सातत्याने पाठपुरावा करीत आहे. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याच्या अनुषंगाने आवश्यक खोलीकरण व सौदर्यीकरण करीता तलाव प्रदुषीत होण्याची कारणे याचा अभ्यास करून वेळोवळी प्रशासनापुढे ठेवण्यात आला आहे. मागील 3 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. अनेक बैठका आणि प्रत्यक्ष स्थळ भेटी झाल्यात. प्रत्येकवेळी तलावातील पाणी सोडण्याची वेळ आणि कामाचा कालावधी किवा निधीचे स्त्रोत आदी बाबीमुळे विलंब होऊन रामाळा तलाव खोलीकरणाचा मुद्दा पुढील वर्षावर जात आहे. मागील वर्षी तत्कालिन जिल्हाधिकारी डाॅ. कुणाल खेमणार यांच्या कार्यकाळात कामास प्रत्यक्ष सुरूवात करण्याचे ठरले होते. तलावातील पाणी सोडून तलावसुध्दा सुकविण्यात आलेला होता, असे असतानाही कोवीडमुळे काम होऊ शकले नाही. मात्र यादरम्यान मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेकोलिला देण्यात आलेल्या निर्देशानुसार वेकोलिमधून भुगर्भातील फेकले जाणारे पाणी शुध्दीकरण करून तलावात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या कामास वेकोलीकडून मंजुरी देण्यात आलेली होती. सदर काम पूर्णत्वास सुद्धा येत आहे. मात्र, अद्यापही सदर तलावात येणारे मच्छीनाला सांडपाणी वळती करणे, नाल्यावर शुध्दीकरण संयत्र उभारणे, तलाव खोलीकरण संदर्भात कुठलीच पावले उचलली गेली नाहीत.

यांसदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, नव्याने जिल्हयाचा कार्यभार सांभळताच इको-प्रो तर्फे भेट घेउन रामाला तलाव बाबत यापुर्वी सुरू असलेले प्रयत्न बाबत माहीती देत रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याच्या अनुषंगाने खोलीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री ना. विजय वडेटटीवार यांना भेटून रामाळा तलाव प्रदुषणाबाबत माहीती देण्यात आली. राज्य शासनाच्या ‘माझी वंसुधरा अभियान’ अंतर्गत तलाव संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आलेली होती.

मागील वर्षी तलावाचे खोलिकरणाकरीता प्रयत्न सुरू झालेले असतांना सुध्दा यंदा तलाव प्रदुषणमुक्त करण्याच्या अनुषंगाने विलंब होत असल्याने आणि तलावातील मासे मृत होण्याइतपत प्रदुषण वाढीस लागल्याने इको-प्रो ने 27 जाने 2021 ला मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देत रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याच्या दृष्टीने विवीध विभागांकडे आवश्यक मागण्या करीत इको-प्रो तर्फे आंदोलन-सत्याग्रहाच्या भूमिकेबाबत निवेदन देण्यात आलेले होते. मात्र यावेळी जिल्हाधिकारी यांनी याबाबत सकारात्मक चर्चा करीत, रामाळा तलावाबाबत बैठकीचे आयोजन केले होते. त्यामुळे सदर आंदोलन 15 दिवस करिता स्थगीत करण्यात आले होते. मात्र, 15 दिवस लोटले असले तरी रामाला तलाव प्रदुषणमुक्त व खोलीकरण करण्याच्या दृष्टीने अद्याप पावले उचलली गेली नाहीत. तसेच तलाव खोलिकरणाच्या अनुषंगाने आर्थिक तरतुदसुध्दा करण्यात आलेली नाही. त्यामुळे 15 फेब्रुवारी ला एकदिवसीय ‘बैठा सत्याग्रह’ करण्यात आलेला होता.

तलावाच्या कामास वेळेची गरज लक्षात घेऊन मागील ऑक्टोबर -नोव्हेबर 2020 पासून पाठपुरावा करण्यात येत आहे. शहरातील एकमेव तलाव, गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला तलाव, आज अतिक्रमणाखाली जात असतांना तलावाच्या संवर्धनाकरिता प्रशासनातर्फे पावले उचलली जात नाही आहे. सध्या फेब्रुवारी महीना पण संपत चाललेला आहे. रामाळा तलाव खोलीकरण करावयाचे असल्यास पुर्ण कामास लागणारा कालावधी गृहीत धरता प्रत्यक्ष कामास सुरूवात करणे आवश्यक आहे. रामाळा तलावाचे संवर्धनाची बाब गंभीरतेने घेत नसल्याने, तसेच तलावाच्या खोलीकरणाच्या कामास लागणारा पावसाळा पुर्वीचा वेळ पुरेसा राहणार नसल्याने, पुरेसा वेळ राखुनच कामाची सुरूवात करण्याची गरज असल्याने नाईलाजास्तव आम्हाला आंदोलनाची भूमीका घेत असल्याचे इको-प्रो चे बंडू धोतरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here