मनपा व वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या वतीने राबविण्यात आली रामाळा तलाव स्वच्छता मोहीम    

चंद्रपूर ४ फेब्रुवारी – चंद्रपूर शहर महानगरपालिका व वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रामाळा तलाव स्वच्छता मोहीम नुकतीच राबविण्यात आली. सद्यस्थितीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचातत्वासोबत जीवनपद्धती अंगीकारणे गरजेचे असल्याने या पंचतत्वावर आधारित “माझी वसुंधरा” अभियान हे राज्यातील 667 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत असून या अभियानातंर्गत जलस्रोत स्वच्छता मोहीम चंद्रपूर शहरात राबविण्यात येत आहे.
रामाळा तलावातील गाळ वाल्मिकी मछूआ सहकारी संघटनेच्या मदतीने बाहेर काढण्यात आला व आजूबाजूचा परीसर स्वच्छ करण्यात आला. मछूआ सहकारी संघटना सदस्यांचे याप्रसंगी विशेष योगदान लाभले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे  “माझी वसुंधरा” अभियानाच्या अनुषंगाने रामाळा तलावाच्या स्वच्छतेसंबंधी अभिनव मार्गाद्वारे जनजागृती सातत्याने केली जात आहे. सुमारे ५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन इतिहास असलेला रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र तलावाची स्वच्छता व सौदर्यीकरणासाठी जागृत होणे आवश्यक आहे.  आपल्या रामाळा तलावासंबंधी नागरिकांचे प्रेम जागृत व्हावे व कुठल्याही स्वरूपाचा कचरा विशेषतः प्लास्टिक व थर्माकोल कुणीही तलावात टाकू नये याकरीता मनपाद्वारे विशेष प्रयत्न केले जात आहेत.
मनपाद्वारे माझी वसुंधरा” अभियान राबवितांना जल पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन, तलावांसह सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, असे प्रकल्प शहरात राबविण्यात येणार आहेत. नुकतेच गोंडकालीन ऐतिहासिक बावडी – विहीर स्वच्छता अभियान मनपाद्वारे सुरु करण्यात आले आहे.
याप्रसंगी स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, वाल्मिकी मछूआ सहकारी संघटना, आरोही फाऊंडेशन व एएसपीएम संस्थेच्या साक्षी कार्लेकर, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here