
चंद्रपूर,26 डिसेंबर:मी आजवर बल्लारपूर शहराच्या विकासासाठी जे प्रयत्न केले त्या आधारावरच बल्लारपूरकर जनतेने माझ्यावर मनापासून भरभरून प्रेम केले. या शहरातील नागरिकांच्या प्रेमाच्या बळावरच मी अनेक प्रतिष्ठेच्या पदांचा मानकरी ठरलो. बल्लारपूर शहराच्या विकासाला नवा आयाम देण्याचा मी कायम प्रयत्न केला. बल्लारपूरातील बेघर नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातुन घरे उपलब्ध व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. रोजगारासाठी अनेक निर्णय मी मंत्री पदाच्या काळात घेतले. सर्वच निर्णय एकदम घेता येत नाही. मात्र या शहराच्या विकासासाठी मी कधिही निधीची कमतरता भासू दिली नाही. आठवडाभरापूर्वीच बल्लारपूर शहरासाठी 5 कोटी रू. निधी मी मंजूर करविला. नागरिकांच्या प्रेमाच्या बळावर बल्लारपूर शहराच्या विकासाची प्रक्रिया अधिक गतीमान करणार असा विश्वास माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दिनांक 25 डिसेंबर रोजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न झाले. त्यानिमीत्ताने बल्लारपूर येथील नाटयगृहात आयोजित सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, बल्लारपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. मिना चौधरी, भाजपा अध्यक्ष काशी सिंह, निलेश खरबडे, समीर केने, अजय दुबे, मनीष पांडे, अॅड. रणंजय सिंह, आशिष देवतळे, राजू गुंडेट्टी, राजू दारी, कांता ढोके, नगर परिषद सदसय येलय्या दासरप, सुवर्णा भटारकर, जयश्री मोहुर्ले, अरूण वाघमारे, स्वामी रायबरम, सारिका कनकम, विश्वजीत चंदेल, बुचय्या कंदीवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन अटलजींच्या जयंतीनिमीतत संपन्न झाले. अटलजींनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिली. नाताळाच्या दिवशी अटलजींचा जन्म झाला. परस्परांमध्ये प्रेमभावना वृध्दींगत करणे हा नाताळाचा संदेश आहे. तोच संदेश अटलजींनी कायम अंगीकारले. त्यांनी राजकारणापेक्षा स्नेहभावनेला अधिक महत्व दिले. म्हणूनच ते देशातील अजातशत्रु नेते ठरले. त्यांच्या जन्मदिनी ही विकासकामे लोकार्पित केल्याबद्दल त्यांनी नगराध्यक्षांचे अभिनंदन केले. बल्लारपूर शहरातील नागरिकांनी नेहमीच आपल्यावर भरभरून प्रेम केले, आशिर्वाद दिला असे सांगत आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, विधानसभेतील खुर्चीपेक्षा जनतेच्या मनातील स्थानाला मी नेहमीच महत्व दिले आहे. या शहरातील नागरिकांनी आपल्या परिवारातील सदस्यांप्रमाणे माझ्यावर प्रेम केले. या शहरात विकासकामांची दिर्घ मालिका मी तयार करू शकलो याचा मला आनंद आहे. पाणी पुरवठा योजना, ग्रामीण रूग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मीती, तहसिल कार्यालय इमारतीचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज नाटयगृह, विमानतळासारखे सुंदर बस स्थानक, राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्मार्ट पोलिस स्टेशन, छठपूजा घाट, मुख्य मार्गांचे सिमेंटीकरण, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मीती, अत्याधुनिक भाजी मार्केट, ई-वाचनालये, चार बालोद्याने अशी विविध विकासकामे पूर्णत्वास आली. या शहरातील रेल्वे स्थानक देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक ठरले. बल्लारपूर शहरानजिक देशातील अत्याधुनिक अशी सैनिक शाळा साकारली असून सर्व आवश्यक क्रिडा सुविधांनी परिपूर्ण असे तालुका क्रिडा संकुल देखील पूर्णत्वास आले आहे. राजु-यानजिक विमानतळाची निर्मीती व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातुन जिल्हयाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. त्यामुळे डिफेन्सशी संबंधित कार्यवाहीला सुध्दा यामुळे गती मिळेल, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
बल्लारपूर शहरात वीर बाबुराव शेडमाके, स्व. अरूण जेटली, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, संत तुकाराम बालोद्यान अशी चार बालोद्याने, स्व. सुषमा स्वराज ई-वाचनालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाजी मार्केट, जाकीर हुसैन वार्ड, शिवाजी वार्ड येथील 9 सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांचे लोकार्पण तर एका ई-लायब्ररीचे भूमीपूजन व गोरक्षण वार्डातील 5 सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांचे भूमीपूजन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.