रामाळा तलाव खोलीकरणाला हवी “माझी वसुंधरा अभियान”ची साथ

चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्यास महाराष्ट्र शासनाच्या “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, या मागणीची निवेदन इको-प्रोतर्फे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले.आज सिंदेवाही येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत मानद वन्यजीव रक्षक, इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, यांनी जिल्हातील पर्यावरण, वन-वन्यजीव विषयक मुद्यावर चर्चा केली. अनेक विषय गंभीरतेने घेत पालकमंत्री यांनी याबाबत त्वरित बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

रामाळा तलाव ऐतिहासिक चंद्रपूर शहराचा वारसा आहे. मात्र,आज अनेक पर्यावरणीय प्रदूषणाच्या समस्येच्या विळख्यात अडकलेला असून, यास नवसंजीवनी देण्याची गरज असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले. सदर तलाव शहरातील मच्छिनाल्यातून वाहून येणारे सांडपाणी साचण्याचे केंद्र झालेले असून, सदर प्रदूषित पाण्यामुळे परिसरात घाण वास तसेच इकॉर्निया जलपर्णी वाढीस लागली आहे. शहरातील अनेक तलाव काळाच्या ओघात नष्ट झाल्याने या एकमेव तलावाचे तसेच गोंडकालीन वारसा जतन करण्यास त्वरित पावले उचलण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण विभागतर्फे “माझी वसुंधरा अभियान” सुरू केले असून, या अंतर्गत पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, वायू, अग्नी व आकाश आदीचे संरक्षण व संवर्धन करिता व्यापक कार्यक्रम आखला आहे. यात राज्यातील अनेक शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात चंद्रपूर शहर असल्याने या शहरातील रामाला तलाव संवर्धन करण्यास पुढाकार घेण्याची गरज आहे.

रोजगार-मासेमारी समस्या –
रामाला तलाव पर्यावरण-प्रदूषण समस्या सोबत या तलावावर मासेमारी करून उदरनिर्वाह करणारी शेकडो परिवार यांची सुद्धा मोठी अडचण झाली असल्याने, भविष्यात त्यांना सुद्धा व्यापक रोजगार निर्मिती व्हावी म्हणून सुद्धा प्रयत्न करणे शक्य होणार आहे.

पर्यटन दृष्ट्या महत्व –
पर्यटन दृष्टया या शहरातील रामाला तलाव व उद्यान यास मोठे महत्व आहे, मात्र तलावातील प्रदूषण, जलपर्णी यामुळे तलावाच्या सौंदर्यास ग्रहण लागले आहे. तलावाचे खोलीकरण झाल्यास सौंदर्यीकरण वाव आहे, रामाला तलावाच्या विसर्जन पॉईंटकडून उद्यान कडे जाण्यास मार्ग तयार झाल्यास, या तलाव-उद्यानाचे महत्व वाढेल, त्यामुळे शहरातील स्थानिक पर्यटनाला वाव मिळेल.

तलावाचे खोलीकरण आणि आवश्यक कार्य केल्यास, तलावात येणारे लगतच्या वसाहतीचे घाण पाणी थांबविता येणार आहे. जलनगर वस्तीच्या बाजूने होणारे अतिक्रमण थांबविण्यासाठी सुरक्षा भिंतीचे बांधकाम शक्य होईल.पूर्वी अस्तित्वात असलेला रामाला तलाव लगतचा “लेंडारा तलाव” काळाच्या ओघात अतिक्रमणमुळे नष्ट झाला. ही वेळ रामाळा तलावाच्या बाबतीत येणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

रामाला खोलीकरण नंतर तलावात शुद्ध पाणी आणण्यास उपाययोजना म्हणून मच्छिनाला आणि रामाला तलाव ला जिथे जुळतो, तिथेच झरपट नदीकडे वळण नाला आहे. त्या जागेवर जल शुद्धीकरण संयंत्र उभारणे, आणि रामाला तलावात वेकोली कडून खान काम दरम्यान भूगर्भातून उपसा होणारे पाण्याचे नियोजन करून, त्यास शुद्ध करून वेकोलीमार्फत तलावात आणणे शक्य असून याबाबत वेकोली तयार असल्याने ही समस्या सुद्धा कायमची निकालात निघू शकते.
आदी सर्व बाबीचा अनुषंगाने चर्चा करीत पालकमंत्री यांना रामाळा तलाव बाबत माहिती देण्यात आली, यावर सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल असे आश्वस्त करण्यात आले आहे.

वन-वन्यजीव विषयक बाबीवर चर्चा-

जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संघर्ष विषयक बाबीवर चर्चा करण्यात आली. बिबट समस्यामुक्त ग्राम विषयी सादरीकरण करण्यात आले. शेतकरी-शेतपिक-वन्यप्राणी संरक्षणकरिता सौर ऊर्जा कुंपण योजना ताडोबा-बफर च्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्वच वनव्याप्त गावातून राबविण्याबाबत तसेच सदर योजनेचे महत्व विषयी चर्चा, स्थानिक पातळीवर प्रायमरी रिस्पॉन्स टीम मानव-वन्यप्राणी संघर्ष दरम्यान स्थानीक युवकांचा सहभाग कसा महत्वाचा आहे, याबाबत चर्चा करण्यात आली लवकरच या सर्व विषयाबाबत बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here