महापौरांनी केली जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिरिक्त निधीची मागणी

चंद्रपूर २८ ऑगस्ट – मागील काही महीने हे कोव्हीड १९ च्या सावटाखाली गेले आहेत. आटोक्यात असलेली चंद्रपूर शहरातील कोरोना संक्रमितांची संख्या आता झपाट्याने वाढते आहे. या संपूर्ण काळात संक्रमित रुग्णांची संपुर्ण व्यवस्था महानगरपालिकेद्वारे करण्यात आली. या काळात कुठलीही कर वसुली होऊ शकलेली नाही. त्यामुळे मनपाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ही चिंताजनक बाब लक्षात घेता मा महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी कोरोना परिस्थितीशी लढण्यास अतिरिक्त निधीची मागणी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
यासोबतच वाढती रुग्णसंख्या पाहता उपाययोजनांमधे वाढ करण्याच्या दृष्टीने शहरातील अँटीजन तपासणी केंद्र वाढविणे, लॉकडाऊन काळातील उपाययोजना इत्यादी अनेक विषयांवर चर्चा झाली. कोव्हीड १९ या विषाणु प्रादुर्भावाच्या काळात चंद्रपूर महानगरपालिका या शहराप्रती, आपल्या नागरीकांप्रती असलेले आपले कर्तव्य चोख बजावीत आहे.   , केवळ शहरच नाही तर संपुर्ण जिल्ह्याचे कोरोना संक्रमित रुग्ण चंद्रपूर शहरात उपचार घेतात, त्यांना मनपाद्वारे विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. कोरोना संक्रमणाच्या सुरवातीच्या दिवसांपासुन संक्रमित रुग्ण तसेच अतिसंक्रमित रुग्णांची निवास व्यवस्था, दोन वेळेचे भोजन, पाणी, चहा, नाश्ता व दैनंदिन गरजेच्या वस्तू यांची संपूर्ण व्यवस्था महानगरपालिकेद्वारे केली जाते. एकप्रकारे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी मनपाकडेच आहे.
मात्र हे कर्तव्य बजावीत असतांना, मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेली कर वसुली ही होऊ शकलेली नाही. नागरीकांद्वारे कराचा भरणा करण्यात आला नसुन, डिसेंबर २०२० पर्यंत कर भरणाची सूट तसेच शास्तीत संपुर्णतः सुट मनपातर्फे देण्यात आली आहे. वाढत्या संक्रमणाचा विचार करता मनपाची जबाबदारी वाढते आहे मात्र आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून महानगरपालिकेला आपली जबाबदारी पार पाडण्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करून निवेदन महापौर सौ राखी कंचर्लावार यांनी दिले.
तसेच चंद्रपूर शहरातील कोरोना संक्रमीत बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील लॉकडाऊनची मोठी जबाबदारी महानगरपालिकेने समर्थपणे पार पाडली होती.  आता लॉकडाऊन करावयाचे झाल्यास शहराच्या सीमा कडक बंदोबस्त ठेऊन पूर्णपणे सील करण्यात याव्या. कोणालाही प्रवेश मिळु नये. गरजू लोकांकरीता शिवभोजनाची व्यवस्था करण्यात यावी. अँटीजन टेस्टींग सेंटरची संख्या वाढविण्यात यावी. १२०० ते १५०० अँटीजन टेस्ट दररोज व्हाव्या.अश्या स्वरूपाची चर्चा याप्रसंगी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here